मोहीम: कोथळीगड-पेठ
कुठल्याही शुभ कार्यासाठी सकाळी उठायचे ठरले की लेखक महाशयांना रात्री झोप येत नाही. कोथळी गड -पेठ येथे जायचे ठरले तसे सर्व सामानासकट रात्रीच मित्राचे घर गाठले पण सर्व झोपले तरी निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न होईना. चार वाजता कुठेशी थोडी झोप लागल्यासारखे वाटले तोच सहा वाजले आणि मोहीम सुरु झाली. सगळ्यांची जमवाजमव आणि ट्रेकच्या सूचनांचे कार्यक्रम झाल्यावर सात वाजता गाडी हलली. प्रवासामध्ये उत्साही मावळ्यांनी लोकगीते,पोवाडे,भजन म्हणत प्रवास सुखकर केला. आंबिवली गावाच्या पायथ्याशी १० वाजता नाश्त्यासाठी उतरलो. पोहे आणि चहा पोटात उतरवून गडाच्या दिशेने चालू लागलो.
बऱ्याच दिवसांनी लेखक महाशयांनी कॅमेरा बाहेर काढल्याने फोटो सेशन जोरदार सुरु झाले. कॅमेऱ्याच्या जीवात जीव असेपर्यंत फोटो काढायचे असे ठरवून मिळेल ते क्लिकत चाललो होतो. सोबतीला नावापुरतेही उन्ह म्हणून नव्हते त्यामुळे ट्रेकसाठी वातावरण प्रसन्न होते. शिवाय इतर ट्रेकर्सप्रमाणे पाठीवर बॅग न घेता चालल्याने आम्ही बरेच बागडत होतो.
इथून वर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे जो आपल्याला गडाच्या सुळक्याच्या माथ्यावर पोहोचवतो. नवख्या ट्रेकर्सना हा भाग चढणे अवघड वाटू शकते. पट्टीचे ट्रेकर्स सरसर चढत शिखर गाठतात. बरोब्बर एकच्या ठोक्याला आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर वारा बेभान वाहत होता आणि धुक्याने बाजूचा परिसर व्यापला होता. तिथेच हा झेंडा रोवून मग माघारी परतलो. विश्रांतीसाठी फार वेळ थांबता येणार नव्हते कारण भोजनाची सोय किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हॉटेलमध्ये केली होती.
माघारी परतताना पुन्हा पेठ गडाचा फोटो काढून घ्यायचे ठरवले. तिथे हे एकाकी घर लक्ष वेधून घेत होते. सुदैवाने गड उतरताना पावसाला पुन्हा हजेरी लावली नाही त्यामुळे कपडे वाळवण्याची चिंता मिटली. या सपाट मैदानी प्रदेशावरून अनेक छोटे छोटे प्रवाह खाली कोसळत होते. पावसाळी दिवस असल्याने दिसणारा हा नयनरम्य देखावा उन्हाळ्यात मात्र फारच भकास वाटत असावा. पुढे उतरणीची वाट बरीच लांब भासू लागली कारण पोटातील कावळे ओरडून थकले होते आणि मार्ग काही संपत नव्हता. शेवटी एकदाचा तळ गाठला आणि मग पिठलं-भाकर, छोले, डाळ-भात, पापडावर आक्रमण झाले. सोबतीला पुन्हा पाऊस बरसू लागला होता.
किल्ला संपवूनही काही जणांना अजून भटकायची हौस होती तेव्हा जवळच असणाऱ्या एका नदीवर जायचे ठरले. पण गाडीतून उतरल्यावर मात्र नदीकिनारी असणाऱ्या एका पांडवकालीन लेणीकडे सगळ्यांची पावले वळली. तिथे असणाऱ्या एका ६७ वर्षीय गृहस्थांनी या लेणीबद्दल बरीच माहिती सांगितली. काही देवांच्या प्राचीन मूर्त्याही तिथे आहेत. निघण्यापूर्वी सर्वानुमते देवाची आरती करायचे ठरले आणि पुढील काही वेळ लेणीमध्ये आरती आणि टाळ्यांच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटू लागले. जिथे काही बेजबाबदार तरुण दारूच्या पार्ट्या आणि आधुनिक भिंतीचित्रे काढून आपल्या संस्कृतीची विल्हेवाट लावतात तिथे धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणारे मित्र सोबतीला असल्याचा अभिमानही वाटला. लेणीच्या समोरील बाजूस हा कलावंतीणीचा महाल दिसला.
तिथून गाडीमध्ये शिरलेले मावळे आता गाणी गाण्याच्या मनस्थितीत नव्हते. बरेचजण निद्रेच्या आहारी गेले असताना कुणी तरी गाडीमध्ये सीडी प्लेयर सुरु केला आणि अतिशय टुकार गाणी लावत सगळ्यांचा मूड खराब केला. त्यातच जसे पनवेल गाठले तसे गाडी बंद पडली तेव्हा लक्षात आले की डिझेल संपले आहे. ट्रेक वरून माघारी येण्याचा आणि पनवेल गाठण्याचा असा काय संबंध आहे की तिथे नेमक्या गाड्या बंद पडतात असा प्रश्न मला पडला होता. शिवाय गाडी बंद पडल्या ठिकाणाहून पेट्रोलपंप दहा मिनिटाच्या अंतरावर असूनही तिथे दोन तास खर्ची पडल्याने वाहन चालकाचा बराच उद्धार करण्यात आला. नऊ वाजता गाडी हलती झाली आणि सगळे मावळे नवी मुंबईचेच असल्याने निरोप घेत एक-एक जण पायउतार होऊ लागले. थकल्या पावलांनी निरोप घेताना पुढचा ट्रेक कधी याची उत्सुकता लागून राहिली होती.
ट्रेकचे इतर फोटो इथे पाहावेत.
ता.क.- दुसऱ्या दिवसापासून चालण्यात थोडा बदल झाले आहे असे वाटतेय पण चालायचेच.
मस्त आहे हा ट्रेक...पूर्ण किल्ल्याला आम्ही फेरी मारली होती. एकदम जबरदस्त अनुभव :) :)
ReplyDeleteमागच्या वाटेने कुणी जाताना दिसत नव्हते...आडवाटेला काही टवाळखोर धुक्यातच फुकट बसले होते म्हणून नाही गेलो.
ReplyDeleteलई मजा आली पण.
Foto Ashakya bhari aale aahet...
ReplyDeleteDhanyawad !
ReplyDeleteMast write up ani surekh warnan! Good to read. Pudhchya aathavdyat peth la jatoy. ya blog cha upayog hoil nakki.
ReplyDeleteApurva
http://houndingtheworld.blogspot.com
धन्यवाद अपूर्व.
ReplyDeleteयंदा लिहायला वेळ मिळत नाहीये म्हणून ब्लॉग ओसाड पडलाय.
ट्रेक करून आलो की आपोआप लिहायला सुचेल.